मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधीकरणाने (जेएनपीए) यांनी मंगळवार, ६ जानेवारी २०२५ रोजी भागधारकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हरित उपक्रमांवर तसेच बंदराच्या भावी वाटचाल व शाश्वततेशी संबंधित विविध धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस कंटेनर टर्मिनल ऑपरेटर, कंटेनर शिपिंग लाईन्ससह प्रमुख भागधारक उपस्थित होते. बदलते जागतिक प्रवाह, बंदर क्षेत्रातील नव्या घडामोडी तसेच भविष्यातील गरजांसाठी कार्यात्मक सज्जतेबाबत विचारविनिमय करण्यात आला. बैठकीत सहभागी भागधारकांनी आपले दृष्टिकोन मांडत समन्वयातून शाश्वत व कार्यक्षम विकास साधण्यावर भर दिला.
संवादाच्या दरम्यान, जागतिक शिपिंग उद्योगात पर्यायी व स्वच्छ इंधनांच्या विकसित होत असलेल्या परिदृश्यावर तसेच हरित इंधनावर चालणाऱ्या जहाजांची जेएनपीए येथे वाढती आवक कशी होऊ शकते, यावर सखोल चर्चा करण्यात आली. अशा जहाजांना सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची तयारी आणि दीर्घकालीन नियोजन याबाबत भागधारकांनी आपले दृष्टिकोन मांडले. यामध्ये एलएनजी, मेथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, अमोनिया आदी विविध प्रकारच्या इंधनांचा अवलंब करण्याची व्यवहार्यता, त्यासाठी लागणारी पायाभूत रचना तसेच सुरक्षित व शाश्वत कार्यपद्धती यांवरही चर्चा करण्यात आली.
चर्चेदरम्यान बंदराने संपूर्णपणे हरित ऊर्जेवर आधारित कार्यप्रणालीकडे संक्रमण करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. यासोबतच कार्यक्षमता, सुरक्षितता व उत्पादकता वाढवण्यासाठी धक्का (व्हार्फ), यार्ड, गेट तसेच रेल्वे ऑपरेशन्समध्ये व्यापक स्वयंचलन (ऑटोमेशन) यार्ड, गेट तसेच रेल्वे ऑपरेशन्समध्ये व्यापक स्वयंचलन. तसेच जहाजांना किनारी वीजपुरवठा (शोर पॉवर सप्लाई) उपलब्ध करून देण्याच्या प्रायोगिक प्रकल्पावर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान भागधारकांना संबोधित करताना श्री गौरव दयाल, भा. प्र. से., अध्यक्ष, जेएनपीए, यांनी सांगितले की, “बंदराचा विकास आराखडा शाश्वतता, स्वच्छ ऊर्जा आणि स्वयंचलन या क्षेत्रांतील जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत ठेवण्यासाठी जेएनपीए सक्रियपणे प्रयत्नशील आहे. भागधारकांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवणे अत्यंत आवश्यक असून, त्यामुळे स्पष्ट संवाद साधता येतो, संरचनात्मक मर्यादा वेळेत हाताळता येतात आणि कोणत्याही संभाव्य त्रुटी दूर करता येतात. यामुळे जेएनपीए भविष्यासाठी सज्ज राहून, सुरळीत, पारदर्शक आणि पर्यावरणदृष्ट्या जबाबदार बंदर संचालन कायम ठेवू शकेल.” बैठकीला जेएनपीएचे उपाध्यक्ष, रवीश कुमार सिंग, भा. रे. प. से. आणि जेएनपीएचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
