कर्तव्यनिष्ठ प्रवासाचा सुवर्ण अध्याय
कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि माणुसकी यांचा सुंदर संगम म्हणजे अजय सदानंद संखे! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात तब्बल 30 वर्षे त्यांनी निष्ठेने सेवा बजावली. वाहक ते वाहतूक नियंत्रक असा त्यांचा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी ठरला. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटी ही जीवनवाहिनी बनवण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. कर्तव्य पार पाडताना त्यांनी नेहमीच प्रवासी आणि कर्मचार्यांच्या हिताला प्राधान्य दिले. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबिरे, जनजागृती आणि विविध उपक्रमांतही ते सक्रिय राहिले. संकटकाळात कर्मचार्यांच्या मदतीला धावून जाणारा संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. संघर्ष, शिस्त आणि सेवाभाव या मूल्यांवर उभा असलेला त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होत असताना, त्यांनी कमावलेला सन्मान आणि प्रेम हीच त्यांची खरी संपत्ती ठरली आहे. —- मंगेश वामन तावडे

जीवनात काही माणसं पदामुळे मोठी होत नाहीत, तर त्यांच्या कामामुळे, स्वभावामुळे आणि माणुसकीमुळे लोकांच्या मनात घर करून जातात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत तब्बल 30 वर्षे निष्ठेने कार्यरत राहिलेल्या अजय सदानंद संखे यांचा प्रवास हा अशाच कर्तव्य, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी प्रवास आहे. 31 मे 2026 रोजी वाहतूक नियंत्रक पदावरून ते सेवानिवृत्त होत असताना, त्यांच्या सेवाकाळातील आठवणी अनेकांच्या डोळ्यांत अभिमान आणि भावुकता दोन्ही निर्माण करणार्या आहेत.

एसटी ही केवळ लालपरी नसते, तर ती ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीचा अविभाज्य भाग असते. या लालपरीला वेळेवर धावती ठेवण्यासाठी हजारो कर्मचार्यांचे कष्ट असतात. त्यात अजय संखे यांनी तीन दशकांहून अधिक काळ अत्यंत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडली. मुंबई सेंट्रल मुख्यालय येथे वाहक म्हणून त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली. त्याआधी वीज मंडळातही त्यांनी नोकरी केली होती. मात्र, एसटी सेवेशी जुळलेली त्यांची नाळ आयुष्यभर घट्ट राहिली.
1998 ते 2012 या काळात वाहक म्हणून काम करताना त्यांनी प्रवाशांच्या सुखद प्रवासाला नेहमीच प्राधान्य दिले. त्यानंतर वाहतूक नियंत्रक म्हणून जबाबदारी स्वीकारत त्यांनी शिस्त, नियोजन आणि व्यवस्थापन यांचा सुंदर समन्वय साधला. एटीआय परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रमोशनची संधी हुकली, ही खंत त्यांच्या मनात कायम राहिली; पण त्या वेदनेला त्यांनी कधीही नकारात्मक रूप दिले नाही. उलट, पद मोठं नसतं, काम मोठं असतं, या विचाराने त्यांनी आपल्या सेवेला अधिक समर्पित केले.
अजय संखे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमान म्हणजे आपल्या कोलवडे गावासाठी सुरू करून घेतलेली एसटी बस सेवा. ग्रामीण भागातील लोकांना प्रवासासाठी होणारा त्रास त्यांनी जवळून पाहिला होता. म्हणूनच गावासाठी एसटी सुरू व्हावी, ही त्यांची धडपड होती. अखेर ती यशस्वी झाली आणि गावकर्यांच्या चेहर्यावर समाधान फुलले. आजही अनेक ग्रामस्थ त्या योगदानाची कृतज्ञतेने आठवण काढतात.

शिक्षक कुटुंबातील संस्कार त्यांच्या आयुष्याचा भक्कम पाया ठरले. आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने शिक्षण, शिस्त आणि समाजसेवा हे गुण त्यांच्यात बालपणापासून रुजले. पत्नी अपेक्षा अजय संखे या कला शाखेच्या पदवीधर असून त्यांनी कृषी पदविकाही प्राप्त केली. 1985 च्या बॅचच्या असूनही नोकरीची संधी न मिळाल्याने त्यांनी संसार आणि मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले. पतीच्या प्रत्येक संघर्षात त्या खंबीरपणे सोबत राहिल्या.

मुलगा मंथन हा एमबीए करून नोकरी करत आहे, तर मुलगी अनुष्का बी.फार्मचे शिक्षण घेत आहे. आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन आयुष्यात यशस्वी व्हावे, यासाठी संखे दांपत्याने अपार मेहनत घेतली. 2000 साली वडिलांचे निधन झाले, तेव्हा अजय संखे यांचे वय कमी होते. घराची जबाबदारी, आईचा आधार आणि संसाराचा गाडा या सर्व गोष्टी सांभाळताना त्यांनी कधीही हार मानली नाही. आईला धीर देत पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अलीकडेच आईच्या 80व्या वाढदिवसानिमित्त सहस्त्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, तो त्यांच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक क्षण ठरला.

एसटी सेवेसोबतच सामाजिक कार्याची त्यांची तळमळही तितकीच मोठी होती. पालघर आगारात कर्मचार्यांसाठी आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांचे त्यांनी आयोजन केले. शिवजयंती, दत्तजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे कार्यक्रम त्यांनी उत्साहाने साजरे केले. कर्मचार्यांमध्ये एकोप्याची भावना वाढावी, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले.








मुलींना मोफत एसटी पास योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी स्वतः विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. दांडेकर कॉलेज, जीवन विकास, चाफेकर, आर्यन, सुंदरम्, शिरगाव निजप हायस्कूल अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी जाऊन योजनांची माहिती दिली. शिक्षणासाठी प्रवास अडथळा ठरू नये, हा त्यामागचा त्यांचा प्रामाणिक हेतू होता.

एसटी कर्मचार्यांच्या सहा महिन्यांच्या संपकाळात त्यांनी दाखवलेली माणुसकी आजही अनेकांच्या मनात जिवंत आहे. अनेक चालक-वाहकांच्या घरात चूल पेटत नव्हती. अशा वेळी त्यांनी लोकप्रतिनिधींना मदतीसाठी पुढे येण्यास भाग पाडले. स्वतःच्या स्तरावर तब्बल 200 किलो धान्य देऊन अनेक कुटुंबांना आधार दिला. आमदार, खासदार यांच्याकडूनही मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. संकटात माणसांसाठी धावून जाणारा हा संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत साफसफाई मोहिमांमध्येही त्यांनी पुढाकार घेतला. नगर परिषदेकडून घंटागाडी बोलावून घनकचर्याची विल्हेवाट लावण्यास भाग पाडणे, परिसर स्वच्छ ठेवणे, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्वच्छ आणि थंड पाण्याची व्यवस्था करणे, अशा छोट्या वाटणार्या पण महत्त्वाच्या कामांत त्यांनी नेहमी सहभाग घेतला.
तत्कालीन आमदार श्रीनिवास वनगा यांच्या आमदार निधीतून पालघर आगारासाठी 10 लाख रुपयांचा रस्ता मंजूर करून घेण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्याआधी आगार परिसरात मोठमोठे खड्डे असल्याने कर्मचार्यांना आणि वाहनांना त्रास सहन करावा लागत होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही समस्या दूर झाली.

पालघर रेल्वे स्थानक परिसरात एसटीचे वाहक आणि नियंत्रक यांना थांबण्यासाठी स्वतंत्र केबिन मंजूर करून घेणे, हेही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले. एसटी बस, रिक्षा, सहा आसनी रिक्षा आणि इको गाड्यांमध्ये पार्किंगवरून वारंवार वाद होत असत. अशा वेळी रेल्वे पोलिसांच्या मदतीने वाद मिटवून समन्वय निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. एसटीचे भारमान कसे वाढेल, प्रवासी संख्या कशी वाढेल आणि महामंडळ नफ्यात कसे येईल, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
संघटनात्मक पातळीवरही ते सक्रिय राहिले. सध्या ते शिव वाहतूक सेनेच्या पालघर आगार अध्यक्षपदी कार्यरत असून सुमारे 200 सभासद त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. सेवानिवृत्तीच्या या टप्प्यावर अजय संखे यांनी अनेक सहकार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. डेपो मॅनेजर नितीन चव्हाण, सुजित घोरपडे, विभागीय नियंत्रक मोरे, गायकवाड, अजित गायकवाड, कैलास पाटील आणि इतर सहकार्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रवास शक्य झाला नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज सेवानिवृत्त होताना त्यांच्या हातात कदाचित कोणतेही मोठे पद नसले, तरी हजारो लोकांच्या मनात त्यांनी कमावलेले प्रेम, सन्मान आणि विश्वास हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे. संघर्ष, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेला अजय संखे यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
