सुरक्षिततेच्या दृष्टीने अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश
पालघर :
वैतरणा नदीवरील रेल्वे पूल क्रमांक ९३ परिसरात संभाव्य धोका लक्षात घेता नौकानयनावर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सुभाष भागडे, अपर जिल्हादंडाधिकारी, पालघर जिल्हा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू केला आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुख्य ब्रिज अभियंत्यांनी रेल्वे पूल क्रमांक ९३ च्या कार्यक्षेत्रात रेती उत्खनन व नौकानयनामुळे पुलास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर पुलाच्या दोन्ही बाजूंना २ किलोमीटरच्या परिसरात दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ वाजल्यापासून २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी नौकानयनास मनाई करण्यात आली आहे.
पोलीस, मेरीटाईम बोर्ड, नौदल, मत्स्य व्यवसाय व इतर शासकीय विभाग वगळता कोणालाही जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय नौकानयन करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
