पालघर :
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिंधुरत्न मित्रमंडळ, पालघर यांच्या वतीने २६ जानेवारी २०२६ रोजी भव्य स्नेहसंमेलन व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मंडळातील सर्व सभासद व कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी १ वाजता अध्यक्ष वागेश कदम यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
सायंकाळी ५:४५ ते ७ वाजेपर्यंत पारंपरिक तिळगुळ समारंभ पार पडणार असून, त्यानंतर ७ ते ८ वाजेपर्यंत बक्षीस वितरण समारंभ व अध्यक्षीय भाषण होणार आहे. रात्री ८ वाजल्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजन व कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.
मुलांमधील खेळाडूवृत्तीला चालना देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सभासदांनी क्रिकेट सामने आवर्जून पाहावेत, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. क्रिकेट खेळणाऱ्या सर्व मुलांनी दुपारी १२:३० वाजता मैदानावर उपस्थित राहणे आवश्यक असून, यासाठी संबंधित प्रमुखांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सभासदांनी सहपरिवार उपस्थित राहून प्रजासत्ताक दिनाचा आनंद सामूहिकरीत्या साजरा करावा, असे आवाहन अध्यक्ष वागेश कदम, सेक्रेटरी तुकाराम राजेशिर्के आणि मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
