पालघरमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के; कोणतीही हानी नाही

पालघर, महाराष्ट्र | प्रतिनिधी : मंगेश तावडे

पालघर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटे १५ सेकंद (IST) या वेळेत भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ३.२ इतकी नोंदविण्यात आली असून भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर खोलीवर होते.

भूकंपाचे अक्षांश व रेखांश अनुक्रमे १९.८३ उत्तर आणि ७२.७६ पूर्व असे नोंदविण्यात आले असून, हे केंद्र मुंबईच्या सुमारे ८४ किलोमीटर उत्तरेस असल्याची माहिती आहे. सदर भूकंपाची नोंद ‘Reviewed Event’ म्हणून करण्यात आली आहे.

या सौम्य धक्क्यांमुळे पालघर शहरासह परिसरातील काही भागांत नागरिकांना क्षणिक कंपन जाणवले. काही ठिकाणी घरातील वस्तू हलल्याचे जाणवले असले तरी, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

भूकंपानंतर नागरिकांमध्ये क्षणिक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तज्ञांच्या मते ३.२ इतकी तीव्रता ही कमी श्रेणीतील असून, अशा भूकंपांमुळे सहसा मोठे नुकसान होत नाही. तरीही नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, भूकंपशास्त्र विभागाकडून पुढील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून, कोणतेही आफ्टरशॉक्स आढळल्यास तात्काळ माहिती देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पालघर जिल्ह्यातील परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button