बारावी विज्ञान शाखेत आश्रम शाळांचा उल्लेखनीय निकाल
पालघर दि. ३ मे २०२६ : आदिवासी भागातील शिक्षणाची उंच भरारी पुन्हा एकदा अधोरेखित करत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत शासकीय आश्रम शाळांनी इयत्ता बारावी विज्ञान शाखेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या निकालात पियुष मंगल तुंबडा (72.67%) यांनी प्रथम क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. ते शासकीय आश्रम शाळा, गुहिर येथील विद्यार्थी असून त्यांच्या यशाने परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
द्वितीय क्रमांक नकुल बारकू दिधा (72.17%) (शासकीय आश्रम शाळा, गोदे) यांना मिळविला, तर सालिविका आनंद जाधव (65.50%) (शासकीय आश्रम शाळा, भोपाली) यांनी तृतीय स्थान पटकावले.याशिवाय ऋषिता देवराम टोपले (65%) (शासकीय आश्रम शाळा, सुतारमाळ) आणि दिपाली सखाराम मोळे (62.50%) (शासकीय आश्रम शाळा, पळसुंडे) यांनीही उल्लेखनीय यश मिळवत गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आदिवासी विकास विभाग तसेच प्रकल्प कार्यालय, जव्हार यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. जव्हार,प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
