नेत्रदानातूनही उजळलेले जीवन – व्हि. डी. सरांची अमर प्रेरणागाथा

काळसे (ता. मालवण) या निसर्गसंपन्न गावाने एका बहुआयामी, आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला निरोप दिला. व्हि. डी. प्रभू सर – एक माध्यमिक शिक्षक, कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक, शिक्षण संस्थाचालक, इतिहास-भूगोलाचे उच्चशिक्षित अभ्यासू प्राध्यापक, प्रगतशील शेतकरी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अत्यंत कुटुंबवत्सल, संवेदनशील माणूस – वयाच्या ८० व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. मात्र, त्यांच्या जाण्याने संपलेले नाही, तर मरणोत्तर नेत्रदानाच्या माध्यमातून त्यांनी दोन अज्ञात जीवनांमध्ये प्रकाश पेरला आहे. म्हणूनच व्हि. डी. सर गेले नाहीत, ते आजही पाहतात… दुसऱ्यांच्या डोळ्यांतून.

व्हि. डी. प्रभू सरांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे शिक्षण, संस्कार आणि समाजासाठी केलेल्या अखंड सेवाभावाची जिवंत शाळा होती. शिवाजी विद्यामंदिर, काळसे या शिक्षण संस्थेशी त्यांचे नाते केवळ नोकरीपुरते मर्यादित नव्हते; ती संस्था म्हणजे त्यांची तपश्चर्या होती. माध्यमिक शिक्षक म्हणून सुरुवात करून मुख्याध्यापक पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा कष्ट, प्रामाणिकपणा आणि शिस्तीचा आदर्श वस्तुपाठ होता. शिक्षक म्हणजे केवळ अभ्यासक्रम शिकवणारा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा मार्गदर्शक असतो, हे प्रभू सरांनी आयुष्यभर कृतीतून दाखवून दिले.

इतिहास आणि भूगोल हे विषय शिकवताना प्रभू सर केवळ धडे सांगत नसत, तर इतिहासातील मूल्ये आणि भूगोलातील वास्तव जीवनाशी जोडून विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवत. शिवाजी महाराजांचे स्वराज्य, सामाजिक समता, राष्ट्रभक्ती, पर्यावरणाचे महत्त्व – हे सारे त्यांच्या अध्यापनातून सहजपणे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरले जाई. अनेक पिढ्यांनी “व्हि. डी. सर” या नावातच ज्ञान, शिस्त आणि आपुलकी पाहिली.

शिक्षण क्षेत्राबरोबरच “व्हि. डी. सर” शेतीतही तितकेच प्रगतशील होते. आंबा, नारळ, काजू, काळी मिरी, उन्हाळी शेती यांची बागायत त्यांनी केवळ परंपरेपोटी नाही, तर आधुनिक पद्धतीने, प्रयोगशील दृष्टिकोनातून जोपासली. नवे तंत्रज्ञान, सुधारित लागवड पद्धती, उत्पादन वाढविण्याचे उपाय – हे सर्व ते स्वतः अमलात आणत आणि इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत. “शिक्षक वर्गात आणि शेतातही आदर्श असू शकतो” हे प्रभू सरांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले.

कुटुंबवत्सलपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत हळवा पैलू होता. कुटुंबातील प्रत्येक नात्यावर त्यांचे प्रेम, आपुलकी आणि जबाबदारीची भावना होती. घरातील आधारस्तंभ म्हणून त्यांनी कुटुंबाला केवळ सुरक्षितता दिली नाही, तर मूल्यांची शिदोरी दिली. प्रामाणिकपणा, कष्टाची सवय, माणुसकी, समाजभान – हे संस्कार त्यांनी पुढील पिढीला दिले.

मात्र प्रभू सरांचे व्यक्तिमत्त्व केवळ त्यांच्या आयुष्यातील कार्यापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांच्या जीवनाचा सर्वोच्च संदेश त्यांनी मृत्यूनंतर दिला, मरणोत्तर नेत्रदानाच्या रूपाने. आज अनेक जण जगताना मोठमोठ्या गोष्टी बोलतात, पण प्रत्यक्ष कृतीतून समाजाला काही देतातच असे नाही. प्रभू सरांनी मात्र मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नेत्रदानामुळे दोन अंधाऱ्या जीवनांमध्ये प्रकाश उजळला, दोन कुटुंबांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला.

नेत्रदान हा केवळ वैद्यकीय निर्णय नसून तो मानवी संवेदनशीलतेचा सर्वोच्च टप्पा आहे. स्वतःचे अस्तित्व संपल्यानंतरही दुसऱ्याला पाहण्याची संधी देणे, याहून मोठे दान कोणते? प्रभू सरांचा हा निर्णय त्यांच्या विचारांची उंची आणि सामाजिक जाणीवेचे दर्शन घडवतो. “मरणानंतरही उपयोगी पडावे” ही शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर ठेवली.

काळसे गावासाठी प्रभू सर म्हणजे चालती-बोलती संस्था होते. गावातील शिक्षण, सामाजिक उपक्रम, सल्लामसलत, मार्गदर्शन – कुठल्याही विषयात त्यांचे मत महत्त्वाचे मानले जात असे. शांत, संयमी स्वभाव, स्पष्ट विचार आणि निर्णयक्षमता यामुळे ते सर्वांच्या आदराचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने गावाने एक मार्गदर्शक, एक विचारवंत आणि एक सच्चा समाजसेवक गमावला आहे.

आज प्रभू सर शारीरिक स्वरूपात आपल्यात नाहीत, पण त्यांनी घडवलेले विद्यार्थी, त्यांनी रुजवलेली मूल्ये, त्यांनी जोपासलेली शेती, त्यांनी दिलेला नेत्रदानाचा संदेश – या सगळ्यातून ते कायम जिवंत राहणार आहेत. त्यांच्या आयुष्याकडे पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते – खरे महानत्व हे पदात नाही, संपत्तीत नाही, तर समाजासाठी उपयोगी ठरण्यात आहे.

व्हि. डी. प्रभू सरांना ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना शब्द अपुरे पडतात. मात्र एवढे नक्की म्हणावेसे वाटते की, त्यांनी जगताना शिक्षणाचा दिवा पेटवला आणि जाताना नेत्रदानातून प्रकाश पेरला. काळसे, मालवण आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी “व्हि. डी. सर” हे केवळ एक नाव नव्हते, तर एक संस्कार होते, एक मूल्य होते, आणि आता एक चिरंतन प्रेरणा आहेत.

आपल्या या महान जीवनयात्रेस विनम्र नमन.

“व्हि. डी. सर”, तुम्ही गेलात नाहीत… तुम्ही अजूनही पाहता, शिकवता आणि प्रेरणा देता.

मंगेश तावडे,

संपादक, दै. राजतंत्र, पालघर

7721994798

tawademangesh@gmail.com

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button