पालघर : तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेला लक्षणीय यश मिळाले असून केळवे ग्रामपंचायत सदस्यपदी पांडुरंग वर्तक, तर बोरशेती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाबुराव भुतकडे विजयी झाले आहेत.

पालघर तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या केळवे ग्रामपंचायतीतील सदस्यपद रिक्त झाल्याने पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग वर्तक यांनी मताधिक्याने विजय मिळवला. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हा विजय शक्य झाल्याचे सांगितले जात आहे. केळवे ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत मानली जात असून या विजयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र आहे.
दरम्यान, बोईसर पूर्व परिसरातील बोरशेती ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्याने ज्येष्ठ शिवसैनिक बाबुराव भुतकडे विजयी झाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अनेक वर्षे शिवसेनेत कार्य केले आहे. आदिवासी पट्ट्यातील त्यांचा दीर्घकाळाचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे त्यांना यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या या पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही अशाच प्रकारे यश मिळेल, असा विश्वास जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी व्यक्त केला.
बोरशेती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्याने निवडून आलेले सरपंच बाबुराव भुतकडे प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच या विजयामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला बळ मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
